जराशी हुरहुरही… असू दे!

Shubham Satpute

Reality Shows मध्ये येणाऱ्या गायकांचं नंतर पुढे काय होतं? हा प्रश्न मला अनेकदा अनेक लोकांनी विचारला आहे. त्यातले काही गायक आपल्याला दिसतात आणि काही लोकांची नावं नंतर फारशी ऐकली जात नाहीत. खरं तर या कार्यक्रमांतून झळकलेले सर्व गायक हे आपल्याला रोज दिसत नसले तरी त्यांचं बरं चाललं असतं. काही गायक पार्श्वगायक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करतात, काही कार्यक्रमांमधून गातात, काही संगीताशी निगडीत इतर व्यवसायात जातात, आणि काही लोक इतर कामं स्वीकारून संगीताचा एक हॉबी म्हणून स्वीकार करतात. Water finds its own level या सिद्धांताप्रमाणेच प्रत्येक गायक आपापली जागा गाठून त्या जागेत सेटल होतो. अर्थात काही स्वप्नभंगही असतातच – हे आयुष्य आहे आणि स्वप्नभंगाचं दुःख कुणाला चुकलंय?

या स्वप्नभंगाचं एक कारण असं आहे की या कार्यक्रमांतून स्पर्धक इतर गायकांची गाणी समर्थपणे सादर करतात परंतु एखाद्या गायकाने गाऊन ठेवलेलं गाणं आणि आपण आपलं स्वतःचं गाणं म्हणणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. इतर कुठल्याही गायकाची छाप त्या गाण्यावर नसताना, थेट संगीतकाराकडून गाणं शिकून ते सादर करणं ही एक वेगळी कला आहे. शिवाय कार्यक्रमात गाणं म्हणणं, स्पर्धेत गाणं सादर करणं याचा skillset आणि गाणं एखाद्या recording studioमध्ये ते गाणं ध्वनिमुद्रित करणं – हा पूर्णतः वेगळं कौशल्य लागणारा अनुभव आहे.

काही दिवसांपूर्वी मला अवधूत गुप्तेचा फोन आला. तो म्हणाला की ‘सूर नवा ध्यास नवा’ या Colors Marathi या वाहिनीवर होणार्‍या कार्यक्रमात एक नवीन संकल्पना राबवावी असं त्याच्या मनात आहे. प्रत्येक आठवड्याला जो गायक त्या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट गायक होईल त्याच्यासाठी एक नवीन गाणं करून ते ध्वनिमुद्रित करायचं. हे सगळं एका आठवड्याच्या काळात करायचं. म्हणजे ज्या दिवशी आठवड्याचा ‘राजगायक’ अथवा सर्वोत्कृष्ट गायक निवडला जाईल त्या दिवशी मी ‘सूर नवा…’च्या सेटवर जायचं, जो गायक अथवा गायिका जिंकेल, त्याला किंवा तिला जेत्याची कट्यार प्रदान करायची, दुसऱ्या दिवशी त्या गायकाच्या आवाजाच्या पोताचा, पट्टीचा अंदाज घ्यायचा. खास त्याच्या किंवा तिच्या आवाजाला शोभेल असं नवं गीत लिहून घेऊन त्याला संगीत द्यायचं आणि पुढच्या दोन दिवसात ते गाणं ध्वनिमुद्रित करून पुढच्या आठवड्याच्या भागात ते सादर करायचं!

मला अवधूतचा हा प्रस्ताव आनंददायी आणि आव्हानात्मक असा दोन्ही वाटला. एखाद्या अनोळखी, तरूण गायकासाठी नवं गाणं करायचं आणि तेही एका आठवड्याच्या अवधीत हे माझ्यासाठीसुद्धा उत्साहवर्धक होतं!

गेल्या आठवड्यात कट्यारीचा हा मान मिळवणारा गायक होता सांगलीचा शुभम्‌ सातपुते. दुसऱ्या दिवशी मी शुभमच्या आवाजाची चाचणी घेतली. मिलिंद जोशी या माझ्या मित्राला गाणं लिहिण्याची विनंती केली. त्याला म्हटलं की शुभमच्या वयाला साजेसं गाणं करूया.

मिलींदने फार सुंदर शब्द लिहून दिले –

जराशी हुरहुरही – असू दे!
जरासा क्षण दुखरा – असू दे!

साई-पियुष या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील साईप्रसाद निंबाळकर या आमच्या मित्राने वार्‍याच्या वेगाने या गाण्यासाठी एक सुरेख ट्रॅक करून दिला. मंदार वाडकर या मित्राने हे गाणं मिक्स केलंय.

हा उपक्रम मराठी चित्रपटबाह्य संगीताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल अवधूतचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे!

What do you think?